माणसे ही धावती घोड्याप्रमाणे
गाव नाही राहिले खेड्याप्रमाणे
प्रश्न जर विचारले साधेच सोपे
उत्तरे देवू नको कोड्याप्रमाणे
एक झाला ज्ञानिया हे खूप आहे
वेद तू गावू नको रेड्याप्रमाणे
पाहतो मी वाट तुझ्या पावलांची
पायरीशी ठेवल्या जोड्याप्रमाणे
सागराला कोणती चढली नशाही
सारखा फेसाळतो सोड्याप्रमाणे
थांबलेली का अशी काठावरी तू
मी उथळ नाही तसा ओढ्याप्रमाणे
वाट जी जाते तुझ्या दारावरुनी
गुंतली पायात या बेड्याप्रमाणे
...कैलास गांधी