Showing posts with label कविता.कवि कैलास.. Show all posts
Showing posts with label कविता.कवि कैलास.. Show all posts

Monday, June 28, 2010

खासदारांची खंत...

लोकशाहीच्या सुभेदारांचा
असा पवित्रा नवा आहे
लोकसेवक वेतन म्हणून
सहावा आयोग हवा आहे

वरकमाईवर म्हणे आता
फक्त आमचे भागत नाही
कार्यकर्ता पोसला तरी
खाल्ल्या मिठाला जागत नाही

....कैलास गांधी

Wednesday, June 16, 2010

भोपाळ चा न्याय ?

राजीव असो वा मनमोहन
तीच ती कथा आहे
कौरवांना सामील 'अर्जुन'
हीच खरी व्यथा आहे
खटल्याच्या निकालानंतर
अहवालाची मागणी आहे
२५ वर्षाच्या जखमांवर
१० दिवसांनी डागणी आहे

....कैलास गांधी

Tuesday, June 8, 2010

मग कोंब कुण्या सृजनाचा माझ्यात अंकुरत असतो...

दररोज स्व:ताला काही मी प्रश्न विचारात असतो
का खुड्लेल्या फांद्यांना अंकुर उगाचच फुटतो

विसरायचे आहे त्याला आधी घडलेले त्याला
तो लाख ठरवतो आणि मागचे उगाळत बसतो

या मातीमध्ये म्हणता रुजणारच नाही काही
मग कोंब कुण्या सृजनाचा माझ्यात अंकुरत असतो

...कैलास गांधी

Monday, April 19, 2010

वाघ झाले संत पाहून हिंस्र झाली मेंढरे...

प्रश्न हि नव्हते समर्पक उथळ होती उत्तरे
सारखे वाटायचे कि हे खरे कि ते खरे

परतण्याच्या पायवाटा प्राक्तनाने खोडल्या
ठेवली चित्रात शिल्लक जीर्ण झालेली घरे

लोकशाहीवर असाही सूड त्यांनी घेतला
वाघ झाले संत पाहून हिंस्र झाली मेंढरे

नाचला मनसोक्त पाऊस रे सुबत्ता यायला, पण
ध्वस्त झालो गाव सांगे पूर जेव्हा ओसरे

आगळा हा निकष लावून लोकगणना जाहली
माणसे नसतील तेथे मोजलेले उंबरे

मोकळ्या नात्यांस जेव्हा संमती होती हवी
काळजीने ग्रासले ते लग्न झाले चेहरे

चक्क आईच्या दुधाचा पाहिला व्यापार तेव्हा
गाय हि गोठ्यात नव्हती, ना तिची ती वासरे

पाहिला मी एक योगी जन्मभर जखमांसावे
वाटले न मग कधीही घाव माझे बोचरे

सापडेन मी मला हीच नाही शाश्वती पण
याचसाठी शोधतो मी अडगळी अन कोपरे

....कैलास गांधी

Tuesday, April 13, 2010

प्रश्न हा फिजूल आहे शब्द हे बेचव कसे...

धावताना तोल गेला..ठेचकाळत राहिलो
दूर ती गेली तरीही मी खुणावत राहिलो

प्रश्न हा फिजूल आहे शब्द हे बेचव कसे
पूर्ण चोथा होईतो जर अर्थ चावत राहिलो

दक्षिणेसाठी खरेतर देव त्यांनी पूजिला
जन्मभर त्यालाच पण मी देव समजत राहिलो

प्रश्न हे बोथट जणू कि, तीष्ण आली उत्तरे
बुद्धीच्या निसण्या वरी मग प्रश्न घासत राहिलो

बदलले हंगाम तरी पण खोड नाही सोडली
त्या तुझ्या इवल्या तळ्याशी रोज बरसत राहिलो

...कैलास गांधी

Tuesday, April 6, 2010

हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो...

वाटेत भेटतो रोज मला धमकावून जातो
हा काळ हरामी मलाच गंडा घालून जातो

घुसतेच कशी हि घरात माझ्या तिरीप कोवळी
मी रोज घराची खिडक्या दारे लावून जातो

इथे मुक्याचे नाणे कधीही वाजत नाही
फक्त बोलका भाव नेहमी खावून जातो

मी देतो शिक्षा माझ्यामधल्या अपराध्याला
जो आरोप नेहमी माझ्यावरती ठेवून जातो

मी पुढे चाललो आहे कि परतीच्या वाटेवर
हा प्रश्न सारखा तुला मला भंडावून जातो

तो फक्त जमवतो जाहिरातींचे कपटे काही
अन पत्रकार मी खुशाल तरीही सांगून जातो

मी ऋण मानतो फक्त तयाचे माथी माझ्या
तो एक कवी जो काळाला ओलांडून जातो

....कैलास गांधी

Sunday, February 14, 2010

आपला तो बच्चा(न)....


आपला तो बच्चा(न)
दुसऱ्याचा तो खान
एकासमोर तलवार नंगी
दुसरयासमोर म्यान
अस्तित्वाच्या गारुड्या समोर
काढला आहे फणा
वाकली जरी मान
म्हणे,
ताठ आहे कणा !!

.....कैलास गांधी

Monday, February 8, 2010

जोडे आणि पादुका

रामाच्या पादुका ठेवून
भरताने राज्य केले
बंधुप्रेमापायी त्याने
खुर्चीलाही त्याज्य केले
आता मात्र काँग्रेसमध्ये
'जोडे' उचला स्पर्धा आहे
कधी मुंबई ... कधी लातूर
कधी ठिकाण वर्धा आहे
..............
कधी पूर्ण कॅबिनेट ..
कधी मंत्री अर्धा आहे

...कैलास गांधी

Wednesday, January 20, 2010

जागवाया जे मला...



जागवाया जे मला होते निघाले
डोळे त्यांचे आंधळे खोटे निघाले
लिहिले कैलास तसे खूप त्यांनी
शब्द त्यांचे फक्त वांझोटे निघाले

... कैलास गांधी

Saturday, January 16, 2010

जरी असून आंधळा मी....



हा कशा अंधारचाळा हि कशाला कृष्णखोडी
सराईत आंधळा मी सापळ्यातून वाट काढी

हि सुखाची झोपडी कि श्वापदांची मोहमाया
आत पाऊल टाकले तो ते म्हणाले: झाले निघाया

हा कुणी माझ्यातला का असा चेकाळतो
मी म्हणे हि कृष्णवेळा तो दुपार जाळतो

का असे रे बंदी केले पावलांना मोकळ्या
घातली ती पैंजणे कि चांदी साखळ्या

काजळी दिठीत माझ्या चंद्रमा तेजाळतो
जरी असून आंधळा मी रात्र रात्र जागतो

......
कैलास गांधी

Tuesday, January 5, 2010

धान्यापासून दारू.आणि लंगोटीतला कोंकण!



काजू पासून दारू नको
धान्यापासून काढली पाहिजे
महसूलाची आवक फक्त
. महाराष्ट्रात वाढली पाहिजे.

कोकण विकासाच्या नावाखाली
दुषित प्रकल्पांची भिक आहे
इकडे आंबा करपतोय
तिकडे हिरवे पिक आहे

असच चालू आहे म्हणून
विदर्भाला खंत आहे
लंगोटीतला कोंकण मात्र
अजूनही शांत आहे

विदर्भाप्रमाणे कोंकणचा
अनुशेष जरी भरणार नाही
अंतू बर्वा तरीही म्हणतो
आत्महत्या करणार नाही

....
कैलास गांधी

Monday, January 4, 2010

दुख: देखणे माझे सुंदर....



दुख: देखणे माझे सुंदर हळूहळू जे छळते आहे
कुणा ठावे वात पेटली किती खोलवर जळते आहे

मला वाटले पुसून टाकल्या आपल्या मधल्या सीमारेषा
इतक्या वर्षानंतर दोघांमधले अंतर कळते आहे

तुझा कवडसा यावा म्हणुनी मीच छताला खाच मारली
उगाच म्हणती लोक आता की माझे छप्पर गळते आहे

दिसणार नाहीस आता तू पुन्हा कधीही त्या वळणावर
पाऊल माझे अजून तरीही त्याच दिशेने वळते आहे

.....
कैलास गांधी

आरशात या नक्कीच काही गडबड आहे....


रोज चालली स्वप्नांची ही तडफड आहे
समजूत माझी ही जगण्याची ही धडपड आहे

तुला भेटलो त्यास जाहला काळ पुरेसा
उरात तरीही अजून शिल्लक धडधड आहे

मेघ बरसतील कोठे निश्चित पत्ता नाही
उगाच तरीही अंदाजांची गडगड आहे

उंच वाढले वृक्ष वनातील इमारतींचे
नभात आता विमानांची फडफड आहे.

इथे कुणाला बोलायाला उसंत नाही
हाच दिलासा कवितांची तरी बडबड आहे

किती बदललो तरीही दिसतो तसाच अजुनी
आरशात या नक्कीच काही गडबड आहे

.....कैलास गांधी

Monday, December 21, 2009

गोष्ट तेव्हा पासून सुरु होते...


गोष्ट तेव्हा पासून सुरु होते
जेव्हा मी कॉलेज मध्ये शिरत होतो
प्रवेश मिळवण्या साठी या रांगेतून त्या रांगेत फिरत होतो
अश्याच एका रांगेतली मुलगी माझ्याकडे पाहून...
अगदी गोड हसली
अहो, हसली कसली...
एकदम काळजात घुसली
अन काय प्राक्तनाचा योग पहा
दोघांनाही admission मिळाली
आमच्या love mission ला जणू
भगवंताकडून permission मिळाली
एकाच वर्गात असल्यामुळे आमची ओळख वाढू लागली
तीही मग माझ्यासाठी वेळात वेळ काढू लागली
कॉलेज कॅम्पस लायब्ररीत आमच्या प्रेमगप्पा रंगू लागल्या
तेव्हा कॉलेजच्या भिंती सुद्धा आमच्या प्रकरणाने रंगू लागल्या
बापाला हे प्रकरण कळताच त्याने फार नाही ताणलं
कारण पुढे जाऊन दिवटा काय दिवे लावील ?
हे त्याने अगोदरच जाणलं

सहा महिने ठीक चालले नंतर काय झाले कुणास ठाऊक
अचानक तिने वेगळ रहाण्याचा घोष लावला
अन इथेच सरळ चाललेला शनी एकाएकी वक्री धावला
चांगलं प्रशस्त घर सोडून आम्ही छोट्याशा चाळीत राहू लागलो
पाणीटंचाईच्या काळात तांब्याभर पाण्याने न्हाऊ लागलो
आता ती हसत नाही... पूर्वी सारखं रुसतही नाही
माधुरी, मनीषा, जुही तिच्यात कुणी सुद्धा दिसत नाही
सदा रागाचं भूत तिच्या नकट्या वरती सवार असतं
दिवसभर तिचं रूप निव्वळ ललिता पवार असतं
जिच्या मुखातून सतारीचे बोल यायचे,
ते हल्ली नुसतेच तडातडा वाजते
...तरी बरं शेजाऱ्यांचा समज आहे ती फुटाणे भाजते
स्त्रीमुक्तीच्या नावाखाली तिनं कामं वाटून दिलीत
याव्यतिरिक्त कोणतंही काम... ती अजिबात करत नाही
मला उठायला वेळ झाला तर... ती पाणी सुद्धा भरतं नाही
जेव्हा मी कपडे धुतो...तेव्हाच ती भांडी घासते
अन जेव्हा मी तिचे पाय चेपतो...
तेव्हाच ती माझ्या टाळक्याला तेल घासते

विवाहित पुरुष खाली मानेने का चालतात...
ते आज मला कळलं आहे
मात्र मित्रहो असं समजू नका....
हे दुष्ठचक्र तुमच्या प्राक्तनातून टळलं आहे

......कैलास गांधी

Friday, December 18, 2009

प्रकाश घेवून दूर....


अंधारातून तान निघावी सुरेल हिरवी
तशीच यावी तुझी आठवण...अलगद ..अलगद
फेसाळावा उधाणदर्या काळोखाचा...
प्रकाश घेवून दूर निघावे तुझेच गलबत

तुझाच व्हावा भास ऋतूंच्या हुंकारातून
तुझ्याच स्पर्शाने समिंदर फेसाळावा
डोळ्यांमधले गळता हळवे खारे पाणी
गर्भात शिंपला घेवून मोती तेजाळावा

.....कैलास गांधी

वडील गेल्यानंतर...


वडील गेल्यानंतर आता मी...
शोधत रहातो त्यांच अस्तित्व
झाडा, फुला, पानांत...
आजूबाजूच्या प्रत्येक वस्तू...

आता गर्दीतील प्रत्येक वृद्ध व्यक्तीचा चेहरा
मला वाटतो त्यांच्यासारखा...
निर्विकार, समाधानी, ...कोणतीच अपेक्षा नसल्यासारखा.
आता हेलकावत रहाते त्यांची रिकामी आरामखुर्ची...
....नुसतीच वाऱ्यावर..
...अन काळीज हलल्याचे भास होत रहातात सारखे.

वयाच्या पस्तीशीपर्यंत...
माझ्यात जिवंत असलेले लहान मुल..
बापाचा हात सुटल्यासारखं कावरं बावरं झालंय
बिथरला आहे भविष्यकाळ...त्याच्या भूतकाळातील जाणीवांसकट

आता एक मात्र झालंय..
आता शोधावा लागत नाही मला पोरका या शब्दाचा अर्थ
कोणत्या पुस्तकात, शब्दकोशात...
...अथवा एन्सायक्लोपीडीयात देखील
तेवढी समज मला निश्चित आलीय...वडील गेल्यानंतर!

....कैलास गांधी

Monday, December 14, 2009

तुझ्या डोळ्यातून...



तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना
मी शांत राहतो थोडा वेळच
नंतर लगेचच सुरु होतो
माझ्या डोळ्यातील पावसाचा... तुझ्या डोळ्यातील पावसाशी
मुक्त संवाद

पाऊस ओघळत नाही साऱ्याच डोळ्यातून अन,
डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबास..
पाऊसही म्हणत नाही कुणी
आणि म्हणूनच हा प्रत्येक थेंब ओंजळीत साठवताना...
..मी लावत बसतो त्या प्रत्येक थेंबाचा अर्थ
पण अर्थ तर एकमेकात इतके बेमालूम मिसळलेले
कि अर्थ लावता लावता त्याची गाणी होवून जातात
कधी न संपणारी तुझी माझी कहाणी होवून जातात
तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना....

कधी कधी पाऊस तूच होवून येतो
अन ठिबकत बसतो माझ्या भेगाळलेल्या मनाच्या कौलातून
हा पाऊस ओंजळीत मावत नाही...
त्यासाठी मनाचं तळं रुंद कराव लागत..
यात तुझ्या आठवणींचा भणाण वर इतका वेगाचा
कि, हेलकाव्यानी हे तळही उतू जायला लागतं
तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना....

कधी कधी तंद्री लागल्यावर मी लावत बसतो संदर्भ..
तुझा.... पावसाचा ....अन प्रत्येक थेंबाचाही..
पण धाग्यांची गुंतागुंत इतकी वाढत जाते
कि, मी कविताच सोडून देतो अर्ध्यावरती...
...मला चांगलं आठवतंय मी गावी असताना
माझ्या आईच्या डोळ्यातून कोसळणारा पाऊस देखील
असाच शांतपणे पाहत रहायचो..
पण त्या प्रत्येक थेंबाचा अर्थ इतका स्पष्ट असायचा कि
त्यावर कधी कविताच लिहिली नाही

.....कैलास गांधी



Saturday, December 12, 2009

जपून ठेवलेत मी




जपून ठेवलेत मी तुझे अजून आरसे
लक्ख न दिसे तरी धूसर हि न फारसे

येतसे अजूनही तुझीच लाट अंगणी
उंबऱ्याशी काठ आणि हरवलेली चांदणी

चालली कशासही प्रदक्षणा भोवती
मीही नसे एकटा तुझाही कोणी सोबती

....कैलास गांधी

Thursday, December 10, 2009

तोडली घरटी कुणी रे....


संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

गाव मी माझा जरी सोडून आलो
वेस ना ओलांडली तू उंबऱ्याची

लावण्या छातीस माता खुश नाही
बालकाला ओढ वाटे पाळण्याची

सोसले ना लाड ते कंगाल झाले
एवढी मिजास होती लेखणीची

.....कैलास गांधी

मुसाफिर...




घेवूनी पाठीवरी ओझे मुसाफिर चालतो
झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

गाव जे वाटेत येई पावले न थांबती
सावलीला सोडूनी नाते उन्हाशी सांगती
दग्ध झाल्या वादळांना भेटण्या बोलावतो
...झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

पेच आहे ठेच आहे वेदनाही तीच आहे
काळजाच्या अंतराळी तोच मरण पेच आहे
पण धुक्यातून एक तर रोज रस्ता दावतो
...झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

..... कैलास गांधी