Thursday, June 3, 2010

माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले...

पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले

पावसाळी हि तरुंना येईना फुटवा परंतु
जंगलातील बंगल्यांचे वृक्ष डेरेदार झाले

प्राण जाईतो कुणाला लागला नाहीच पत्ता
लोक होते झोपले कि वार हि हळुवार झाले

जन्मदात्यांनाच ज्यांनी लावले देशोधडीला
कायद्याने पण तरीही तेच वारसदार झाले

संधिसाधू दांभिकांची जाहली पुन्हा आघाडी
काळजीवाहू म्हणाया बेगडी सरकार झाले

बोलले काही तरी पण भाविकांना अर्थ कळतो
हे जसे कळले तयांना तेच मग अवतार झाले

येथल्या पोकळ वीरांना राहिली लागून चिंता
गायचा इतिहास कोणी शब्द जर तलवार झाले

......कैलास गांधी

1 comment:

  1. पेटले सोयी प्रमाणे आणि नंतर गार झाले
    माणसांच्या भावनांचे तेच ठेकेदार झाले

    faarch chaan

    ReplyDelete