Wednesday, November 28, 2012
वेदनांची शब्दचित्रे
मी नुकताच एम. एस्सी. रसायनशास्त्र विभागाच्या समन्वयक पदाचा कारभार स्वीकारला होता. मागील पानावरून पुढे या न्यायाने जुन्या व्याख्यात्यांना निमंत्रणे पाठवणे आदी बाबी सुरु झाल्या होत्या. हे काम सुरु असतानाच मला फोन आला... मी गंगाधर मेश्राम बोलतोय... आपले पत्र आलेले नाही... पण मी पुढच्या आठवड्यात कोकणात येतोय ... बघा कसं जमतंय तुमच्याकडे!. मी लगेचच त्यांना हो म्हटले आणि विसरून गेलो. यथावकाश मेश्राम सर आले. त्यांची लेक्चरही संपली. दुपारी त्यांना घेवून जेवायला हॉटेलात गेलो कारण तीनची गाडी पकडायची होती. पोहचे पर्यंत दोन वाजून गेले होते. पण हॉटेल बस स्थानकाजवळ असल्यामुळे तशी चिंता नव्हती. जेवण सुरु करण्यापूर्वी मेश्राम सरांनी एक पुस्तक हातात दिलं. ‘जाणिवेचे हायकू’ नावाचे. म्हणाले एका कविला एका कवीकडून सप्रेम भेट तो पर्यंत सर कविता करतात हे माझ्या गावीही नव्हतं. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिले होतं. प्रिय मित्र प्रा. कैलास गांधी यांना सस्नेह , ३ नोहेंबर, २०११, गंगाधर मेश्राम. वेळेत बस पकडायची याचा ताण होताच, पण त्या मोजक्या क्षणात जे काही या हृदयीचे त्या हृदयी झाले त्याने भावबंध घट्ट झाले. स्थानकावर पोचलो तेव्हा गाडी फलाटावर लागलेली होती. त्यामुळे पुढे संवाद खुंटला.
त्या रात्रीच साराचे पुस्तक वाचायला घेतलं. ‘जाणिवेचे हायकू’ असे नाव असले तरीही शिरीष पै यांनी प्रस्तावनेत यातील अनेक रचना हायकू नाहीत असे नमूद केलेले. हायकू हा प्रकार मला न उमजलेला कविता प्रकार म्हणण्यापेक्षा मी त्याच्या वाट्यालाच गेलेलो नाही हे अधिक सत्य असल्याने खूप उस्तुकता होती.
आकाशात झेपावला
पाखरांचा थवा
आणि सूर्य मावळला
या पहिल्याच रचनेने सुखावलो गेलो. हायकू वाचले होते. त्याच्याशी समांतर जाणारी हि रचना होती. मात्र नंतर लक्षात आले कि हा कवी आपल्या आत खद्खद्णारी वेदना व्यक्त करतोय आणि त्यासाठी त्याने तीन ओळींचा सुटसुटीत प्रकार निवडलाय. मात्र कुठलाही अभिनिवेश नाही आदळआपट नाही फक्त मोकळ होणं.
भाकरीसाठी दिवसभर
वेचते सरवा... ओम्बी
पोरगं दुधास झोंबी
...........................
गावची पायवाट
शहरात आली
खालचे वर ...वरचे खाली
............................
दाणे टीपती चिमण्या अंगणी
एक चिमणी मागे फिरली
का तिलाही जात कळली?
अश्या अनेक रचना खोल रुतायला लागल्या. लक्षात यायला लागले.सामाजिक जाणिवेच संचित या प्रत्येक रचनेत ठासून भरलय. शहरच वास्तव उलगडताना म्हणूनच ...
रात्रीच्या जागरणान
दिवे किती थकले
एका क्षणात झोपले
या मोजक्या शब्दांपेक्षा कवीला अधिक फापटपसारा मांडावा लागत नाही. गावचं वास्तवही तितक्याच स्वाभाविकपणे अंगावर धावून येते.
सकाळी सकाळी पानावर
कुठून मोती पडले
रात्रभर कोण रडले.
..................
गरीबाच्या पोरीचं वय सोळा
गावात गिधाड झाली
झाली गोळा
.................
थापते माय
कुकुसाची भाकर
बाप पाटलाचा चाकर
अशा रचना वादळासारख्या मनावर आदळत जातात... आणि वाटायला लागतं तीन ओळीच्या गाभ्यात या कवीने मराठी कवितेचे आकाश अधिक मोकळे केलेय. मर्यादा स्वीकारूनही चौकटीबाहेरच अनुभवविश्व चौकटीत मांडताना अभिव्यक्तीला कुठेही फाटा दिलेला नाही. यामुळे या रचना डंख मारत नाहीत पण विचार करायला भाग पाडतात. अंतर्मुख करताहेत हि जाणीव घट्ट झाली. आणि मी रचनांच्या प्रेमात पडलो
कलियुगाचा बोलबाला
दिवस जाताच बायकोला
एडमिशन चे बोलून आला
................................
संपली साठी आयुष्याची
चालली कसरत दोरीवर
पी.पी.एफ. संपलं पोरीवर
अश्या मध्यमवर्गीय जानिवांनाही या रचना भिडत होत्या. बाबासाहेबांच ऋण ...
ओसाड वस्तीत
बाबांच्या खुणा
जीवन हसले पुन्हा
असे विनम्रपणे मांडतानाच हा कवी म्हणतो
बाबांच्या नावावर
कुठवर शेकणार पोळी
जनता नाही भोळी.
आणि इथवरच न थांबता थेट हल्ला करतो
तोकड्या हातांनी बाबा
कुठवर भांडू
सरदारच निघाले गांडू !
पुस्तक वाचून संपतं तेव्हा रात्रीचे पावणेतीन वाजलेले असतात. बायकोचा आवाज येतो झोपायचं नाही का?
या रचनांनी उद्दीपित केलेल्या जाणीवा डोक्यात घोंघावत असतातं. झोप येण अशक्य असतं. मी सोपस्कार म्हणून गादीवर पडतो. कवितेसाठी आणखी एक जागरण करण्याच्या तयारीत.
--- कैलास गांधी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment