Monday, December 28, 2009

राजभवनातील रासलीला...



'पान' पिकले तरीही म्हणे
देठ अजून काबूत आहे.
'वारी' करायच्या वयात त्यांची
'ती' सवय शाबूत आहे.

म्हणून त्यांनी राजभवनाचा
रंगमहाल केला.
मिडीयाने उगाच याचा
गाजावाजा केला.
काय चुकले त्यांचे सांगा
सवाल माझा मार्मिक आहे.
नारायण, दत्त...असे त्यांचे
नाव सुद्धा धार्मिक आहे.

....कैलास गांधी

Wednesday, December 23, 2009

कॅम्पस ते स्टाफरूम ...


सकाळी उठल्या उठल्या
दाताला चिकटलेले कालचे संदर्भ
toothpaste सोबत थुंकून टाकताना
काळ निसटून चालल्याची असहाय जाणीव
थरथरत राहते बोटांवर...

पगार, इन्क्रिमेंट, स्ट्रेन्थ हे सारेच प्रश्न यावर्षी सुटतील
प्राणायाम करून बाहेर पडताना कुलकर्णी सांगतो
तेव्हा त्याला वेड लागल्याची घट्ट जाणीव शिवशिवत जाते हिरड्यातून
तत्काळ रूट कॅनल केले पाहिजे मराठे सांगतो

पगारासोबत हिमोग्लोबिनही वाढले पाहिजे
या विवंचनेत रासकर शोधात राहतो परफेक्ट डायेट
botanyच्या कुठल्याश्या पुस्तकात
तेव्हा आपल्या होणाऱ्या बायकोला भेटायला जाण्यासाठी
पैसे हवे असतात मोरेला

सकाळचा नाष्ता करायचा की नाही हे सुट्या पैशावर अवलंबून असताना
रिलायंसचा दिवसाचा नफा किती याची गणिते मांडत बसतो वलेकर
आकड्यांचा आकार वाढत जातो बनियन वरील भोकांसारखा

कॉलेजला पाऊल ठेवताक्षणीच लिमायेंचे बिल आलेले असते
महिन्याचा पगार बोंबलल्याची भविष्यवाणी करतो साठे.
advance मिळेल का? आदी चिल्लर प्रश्न विरून जातात
क्लार्कच्या advance नकारात
आता आयुष्य मिळेल त्या मानधनावर सही करू लागलेय

विनाअनुदानित कॉलेजमधील शिक्षकाप्रमाणे...

...कैलास गांधी

कि कुशीत या झाडाच्या....


पानाच्या पाटीवरती किती रेघोट्या नि रेषा
पानावर लिहिली असते पक्षांची बोलीभाषा

पानाची ओंजळ होता सावरतो थेंब दवाचा
कि कुशीत या झाडाच्या वाढतो वंश मेघाचा

पानाचे अंबर हलता सावल्यांचा गलका होतो
विखुरतो थोडा वेळच मग पुन्हा घोळका होतो

आईन्यात पानाच्या पक्षास गवसला चेहरा
साऱ्याच वाटल्या त्याला आपल्यावर खिळल्या नजरा

पानाच्या जाळ्यामधुनी निसटतो उन्हाचा धागा
बघ प्रकाश हि हक्काने सावलीत मागतो जागा

......कैलास गांधी

Monday, December 21, 2009

गोष्ट तेव्हा पासून सुरु होते...


गोष्ट तेव्हा पासून सुरु होते
जेव्हा मी कॉलेज मध्ये शिरत होतो
प्रवेश मिळवण्या साठी या रांगेतून त्या रांगेत फिरत होतो
अश्याच एका रांगेतली मुलगी माझ्याकडे पाहून...
अगदी गोड हसली
अहो, हसली कसली...
एकदम काळजात घुसली
अन काय प्राक्तनाचा योग पहा
दोघांनाही admission मिळाली
आमच्या love mission ला जणू
भगवंताकडून permission मिळाली
एकाच वर्गात असल्यामुळे आमची ओळख वाढू लागली
तीही मग माझ्यासाठी वेळात वेळ काढू लागली
कॉलेज कॅम्पस लायब्ररीत आमच्या प्रेमगप्पा रंगू लागल्या
तेव्हा कॉलेजच्या भिंती सुद्धा आमच्या प्रकरणाने रंगू लागल्या
बापाला हे प्रकरण कळताच त्याने फार नाही ताणलं
कारण पुढे जाऊन दिवटा काय दिवे लावील ?
हे त्याने अगोदरच जाणलं

सहा महिने ठीक चालले नंतर काय झाले कुणास ठाऊक
अचानक तिने वेगळ रहाण्याचा घोष लावला
अन इथेच सरळ चाललेला शनी एकाएकी वक्री धावला
चांगलं प्रशस्त घर सोडून आम्ही छोट्याशा चाळीत राहू लागलो
पाणीटंचाईच्या काळात तांब्याभर पाण्याने न्हाऊ लागलो
आता ती हसत नाही... पूर्वी सारखं रुसतही नाही
माधुरी, मनीषा, जुही तिच्यात कुणी सुद्धा दिसत नाही
सदा रागाचं भूत तिच्या नकट्या वरती सवार असतं
दिवसभर तिचं रूप निव्वळ ललिता पवार असतं
जिच्या मुखातून सतारीचे बोल यायचे,
ते हल्ली नुसतेच तडातडा वाजते
...तरी बरं शेजाऱ्यांचा समज आहे ती फुटाणे भाजते
स्त्रीमुक्तीच्या नावाखाली तिनं कामं वाटून दिलीत
याव्यतिरिक्त कोणतंही काम... ती अजिबात करत नाही
मला उठायला वेळ झाला तर... ती पाणी सुद्धा भरतं नाही
जेव्हा मी कपडे धुतो...तेव्हाच ती भांडी घासते
अन जेव्हा मी तिचे पाय चेपतो...
तेव्हाच ती माझ्या टाळक्याला तेल घासते

विवाहित पुरुष खाली मानेने का चालतात...
ते आज मला कळलं आहे
मात्र मित्रहो असं समजू नका....
हे दुष्ठचक्र तुमच्या प्राक्तनातून टळलं आहे

......कैलास गांधी

Friday, December 18, 2009

प्रकाश घेवून दूर....


अंधारातून तान निघावी सुरेल हिरवी
तशीच यावी तुझी आठवण...अलगद ..अलगद
फेसाळावा उधाणदर्या काळोखाचा...
प्रकाश घेवून दूर निघावे तुझेच गलबत

तुझाच व्हावा भास ऋतूंच्या हुंकारातून
तुझ्याच स्पर्शाने समिंदर फेसाळावा
डोळ्यांमधले गळता हळवे खारे पाणी
गर्भात शिंपला घेवून मोती तेजाळावा

.....कैलास गांधी

वडील गेल्यानंतर...


वडील गेल्यानंतर आता मी...
शोधत रहातो त्यांच अस्तित्व
झाडा, फुला, पानांत...
आजूबाजूच्या प्रत्येक वस्तू...

आता गर्दीतील प्रत्येक वृद्ध व्यक्तीचा चेहरा
मला वाटतो त्यांच्यासारखा...
निर्विकार, समाधानी, ...कोणतीच अपेक्षा नसल्यासारखा.
आता हेलकावत रहाते त्यांची रिकामी आरामखुर्ची...
....नुसतीच वाऱ्यावर..
...अन काळीज हलल्याचे भास होत रहातात सारखे.

वयाच्या पस्तीशीपर्यंत...
माझ्यात जिवंत असलेले लहान मुल..
बापाचा हात सुटल्यासारखं कावरं बावरं झालंय
बिथरला आहे भविष्यकाळ...त्याच्या भूतकाळातील जाणीवांसकट

आता एक मात्र झालंय..
आता शोधावा लागत नाही मला पोरका या शब्दाचा अर्थ
कोणत्या पुस्तकात, शब्दकोशात...
...अथवा एन्सायक्लोपीडीयात देखील
तेवढी समज मला निश्चित आलीय...वडील गेल्यानंतर!

....कैलास गांधी

Monday, December 14, 2009

तुझ्या डोळ्यातून...



तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना
मी शांत राहतो थोडा वेळच
नंतर लगेचच सुरु होतो
माझ्या डोळ्यातील पावसाचा... तुझ्या डोळ्यातील पावसाशी
मुक्त संवाद

पाऊस ओघळत नाही साऱ्याच डोळ्यातून अन,
डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबास..
पाऊसही म्हणत नाही कुणी
आणि म्हणूनच हा प्रत्येक थेंब ओंजळीत साठवताना...
..मी लावत बसतो त्या प्रत्येक थेंबाचा अर्थ
पण अर्थ तर एकमेकात इतके बेमालूम मिसळलेले
कि अर्थ लावता लावता त्याची गाणी होवून जातात
कधी न संपणारी तुझी माझी कहाणी होवून जातात
तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना....

कधी कधी पाऊस तूच होवून येतो
अन ठिबकत बसतो माझ्या भेगाळलेल्या मनाच्या कौलातून
हा पाऊस ओंजळीत मावत नाही...
त्यासाठी मनाचं तळं रुंद कराव लागत..
यात तुझ्या आठवणींचा भणाण वर इतका वेगाचा
कि, हेलकाव्यानी हे तळही उतू जायला लागतं
तुझ्या डोळ्यातून पाऊस ओघळताना....

कधी कधी तंद्री लागल्यावर मी लावत बसतो संदर्भ..
तुझा.... पावसाचा ....अन प्रत्येक थेंबाचाही..
पण धाग्यांची गुंतागुंत इतकी वाढत जाते
कि, मी कविताच सोडून देतो अर्ध्यावरती...
...मला चांगलं आठवतंय मी गावी असताना
माझ्या आईच्या डोळ्यातून कोसळणारा पाऊस देखील
असाच शांतपणे पाहत रहायचो..
पण त्या प्रत्येक थेंबाचा अर्थ इतका स्पष्ट असायचा कि
त्यावर कधी कविताच लिहिली नाही

.....कैलास गांधी



बोलतो शब्द वेडा मी....




बोलतो शब्द वेडा मी
बोलतो शब्द थोडा मी
थोडाच बोलतो तरीही
मन हलके हलके होते

अंगणात येते रात
अन चंद्र घराच्या आत
श्वासात मिसळता श्वास
देहात चांदणे विझते

ओढाळ वाहतो ओढा
चौखूर दमाचा घोडा
दगडात अडखळे थोडा
मग पुन्हा येई जोसात

मग पाय फुटे वाटांना
स्वप्नात दूर जाताना
भेटता उजेड थोडा
अंधार जाणता होतो

....कैलास गांधी

Saturday, December 12, 2009

जपून ठेवलेत मी




जपून ठेवलेत मी तुझे अजून आरसे
लक्ख न दिसे तरी धूसर हि न फारसे

येतसे अजूनही तुझीच लाट अंगणी
उंबऱ्याशी काठ आणि हरवलेली चांदणी

चालली कशासही प्रदक्षणा भोवती
मीही नसे एकटा तुझाही कोणी सोबती

....कैलास गांधी

Thursday, December 10, 2009

तोडली घरटी कुणी रे....


संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

गाव मी माझा जरी सोडून आलो
वेस ना ओलांडली तू उंबऱ्याची

लावण्या छातीस माता खुश नाही
बालकाला ओढ वाटे पाळण्याची

सोसले ना लाड ते कंगाल झाले
एवढी मिजास होती लेखणीची

.....कैलास गांधी

मुसाफिर...




घेवूनी पाठीवरी ओझे मुसाफिर चालतो
झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

गाव जे वाटेत येई पावले न थांबती
सावलीला सोडूनी नाते उन्हाशी सांगती
दग्ध झाल्या वादळांना भेटण्या बोलावतो
...झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

पेच आहे ठेच आहे वेदनाही तीच आहे
काळजाच्या अंतराळी तोच मरण पेच आहे
पण धुक्यातून एक तर रोज रस्ता दावतो
...झोंबणाऱ्या पावलांना सांगतो समजावतो

..... कैलास गांधी

Wednesday, December 9, 2009

काय हा वेडा कवि देणार होता...




जाहलेला जो कपाळी वार होता
तोच माझा मानलेला यार होता

घोषणा जुन्या जरी विरून गेल्या
तो नवी आस्वासने देणार होता

हार माझी हीच त्याची जीत व्हावी
आज तो माझ्यापुढे जाणार होता

धूळ उडे चेहऱ्याच्या वाळवंटी
अश्रू माझा पापण्यांवर स्वार होता

दूषणांचे श्लोक त्याने वाचले
आजला तो आरत्या गाणार होता

आजही तो ना निकाली लागला
कालचा जो फैसला होणार होता

घेतले चंद्रास मग मी सोबतीला
सूर्य माझ्या मागुनी येणार होता

सोडली तू साथ माझी ठीक झाले
काय हा वेडा कवी देणार होता
......कैलास गांधी


पाउस काही क्षणचित्रे



उर तटतटून यावा आईचा अन
चांदण्याचा निसटावा थेंब...
तसा टपटपतो पाऊस उस्फुर्त ...अनावर

ते इवले इवले तान्हुले थेंब पानाच्या कडांना लुचतात
अन अख्खं झाड पान्हावत आतून बाहेरून...
तीओल जेव्हा आत खोल देठापर्यंत पोहोचते
तेव्हा झाडाचे डोळे साधर्म्य सांगतात
माझ्या आईच्या वास्तल्य वेल्हाळ डोळ्यांशी

पागोळ्यांच्या मुंडावळ्या बांधलेली कौलारू घर
जगाशी संपर्क तोडून स्वत:तच मश्गुल होऊन जातात
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसारखी...

घराच्या गळक्या कौलातून सांडलेला पावसाचा चुकार थेंब
बिनदिक्कत सलगी करू पहातो घरातल्या जमिनीशी
तेव्हा घरातले सारे संस्कृतिरक्षक
तातडीची बैठक बोलावतात यावर उपाय योजण्यासाठी

विज परागंदा होते दूर देशी
अन टेलीफोन जेव्हा शांततेशी गप्पा मारत बसलेला असतो
तेव्हा ज्योतीजवळ साठलेला काळा गारठा दूर सारण्याचा...
केविलवाणा प्रयत्न चालू असतो दिव्याचा

मुंग्या साठवत असतात आपल्या चिमुकल्या घरात
चिमुकले साखरेचे स्फटिक
अन वेडा पावश्या तल्लीन होवून
वेचत असतो मृगाचे कृष्ण कवडसे
तेव्हा अंधाराच्या सीमारेषेवर हिंदकळणारे
एखादे स्वप्नाळू जोडपे ...
आपल्या काजळ डोहात,
भरून घेत असतं तुडुंब पाऊस
पुढचे वर्षभर पुरवून पुरवून वापरण्यासाठी

....कैलास गांधी

Tuesday, December 8, 2009

टक्क डोळे उघडे ठेवून


तिचे sms यावे वाटतात
पण ती करत नाही.
उगाच डोळे भरून येतात
त्यांना का कळत नाही.

टक्क डोळे उघडे ठेवून
जेव्हा मी जागत बसतो
डोक्यावरचा फिरता पंखा
तिचेच वर्तुळ सांधत असतो

आणि अचानक उंबरठ्याशी
ती आल्याचा भास होतो
छातीमधले पिसाट काहूर
अन पंख्याचा श्वास होतो

क्षणभरच ते लगेच कळते
भासच नुसता दुसरे नाही
अन, मग पंखा निमूट बसतो
डोळ्यामधली सुकवीत शाई

...कैलास गांधी

...तर पुढे मागे


परवा माझा मित्र मला म्हणाला कि,
आपण तुझा मेंदूच बदलून टाकू
त्याच्या ऐवजी...
एखादी सिलिकॉन चीप बसवली कि झालं!

म्हणजे काय होईल
तुझी मेमरी पण वाढेल आणि एफिशीअन्सिही!

इंटरनेटचे कनेक्शन मी तुला फ्रीमधे देईन,
म्हणजे,तू इंग्रजीतल्या कविता..
मराठीत ट्रान्सलेट करून...
... स्वताच्या नावावर खपवू शकशील!

समजा बाजारातून तू इंग्रजी टू मराठी
.. आणि मराठी टू इंग्रजी.
असं ट्रान्सलेट करणारं एखादे पेकेज विकत घेतलेस,
तर तू मराठीत एज वेल एज इंग्रजीत...
मोठा कवी म्हणून नावारूपाला येशील।
असो हा भाग वेगळा....

हल्ली मला फार कृत्रिम वाटायला लागलाय.
...हल्ली ती जरी समोरून आली ना
तरी..
हि फाईल कोणती ते मला सर्च करावं लागतं
हल्ली तिच्याशी बोलताना..
मी फार भाऊक वगैरे होत नाही
कारण,
तिच्याशी बोलताना..
ओठावर आलेला प्रत्येक शब्द..
आधीच स्पेलचेक होऊन आलेला असतो.
हे असच चालू राहील ना?
तर पुढे मागे कदाचित...
तिच्या स्पर्शाचे अर्थ समजावणारे,
एखादे पेकेज...
...मला परदेशातून इम्पोर्ट करावे लागेल.
......कैलास गांधी

Monday, December 7, 2009

वारयाने गळावे नकळत....


कपरित जसे फेसाळते पाणी..
तशी येती गाणी तूझ्या ओठी

तलावात जसे तरंगे आकाश..
तसे तुझे श्वास माझ्या देही


आगीच्या पारंब्या भिड़ती आकाशी..
तसे अधाशी तुझे ओठ

उभा देह नुस्ता उधाणला पुर..
आणि अश्वखुर पाय तुझे

वारयाने गळावे नकळत फुल..
तसा जावा जीव तुझ्या काठी

....कैलास गांधी

Saturday, December 5, 2009

हवा पावसाळी


असा गार वारा... हवा पावसाळी
तुझ्या आसवांची हले का? डहाळी


असा कोणता गंध ये आसवांना
मनातून कोणी रुजुवात पाहे
पुन्हा कोंब येती नव्याने बीजाला
मुळामागुनी मूळ निशब्द धावे...
गती येत जाते तुझ्या चिंतनातून...
जुन्या वेदनांना नवी पालवी...


अशी शिळ घाली कोणी मनातून
निळा मेघ सांगे तुझा वारसा
खरे काय ते फक्त डोळ्यास ठावे
तुझा चेहरा हा मला आरसा
नदी खोल धावे ओलावणारी
आणि होत जाती उन्हे कोवळी
- कैलास गांधी

Tuesday, December 1, 2009

नकोस वेडे प्रश्न विचारू......




नकोस वेडे प्रश्न विचारू माझ्यापाशी उत्तर नाही

उघडे पडले घाव जुने तर झाकायाला अस्तर नाही


किती वेळ अन दिवस भेटलो याची कोणी गणती केली

त्या त्या वेळी असे म्हणालो आता भेटू नंतर नाही


बदललास तू सहजच रस्ता आता तो सवयीचा झाला

सवयीचा नक्की झाला कि त्यावाचून गत्यंतर नाही


समीप आलो उगीच वाटले खरे समांतर चालत होतो

किती बदलले रस्ते तरीही आपल्यामधले अंतर नाही


नको दरवळू अशी तू तरी तुझा गंध माझ्यात असुदे

बागेमध्ये फुल व्हावया माझ्यापाशी अत्तर नाही


......कैलास गांधी

Thursday, November 12, 2009

वादळानंतर दापोली....


वादळानंतर दापोलीची पडझड झाली तरीही पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत झाला. अनेक मदतीचे हात पुढे आले. जनजीवन पूर्णपणे सुरळीत झाले नाही तरी पुन्हा नव्या सुरुवातीला सुरुवात झाली. अशावेळी माझ्या प्रकाश सावंत या कवी मित्राची कविता आठवली
कर तांडव सांडव महापूर अश्रूंचा
उधळून तक जा जीवनपट तू आमचा
वलयांकित होवुनी प्रलय देवूनी जा तू
कर दिशाहीन अन क्षितिजे घेवून जा तू
जमवण्या पुन्हा बघ सहस्र कर हे उठले
नमवण्या तुला बघ अंकुर कितीदा फुटले
आम्ही पुन्हा उभारू दिशा नव्या... क्षितिजे नवी
उदयास यावया वाट पाहतो रवी

Wednesday, November 11, 2009

दापोलीची वाताहात




दापोलित आज आलेल्या वादळ वारयाने दापोलीची वाताहत झाली.नैसगिक आपत्तिपासून सुरक्षित समजल्या जानारया दापोलिला आज तब्बल १८ वर्षानी पुन्हा तडाखा बसला.अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुक बंद झाली होती. तालुक्यात अनेक घरांवर झाडे पडल्याने करोडोंची वित्तहनी झाली. विजेचे खांब जागोजागी कोसळल्याने . विज यंत्रणा सुरक्षित होण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दापोली बाज़ार पेठेतुंन जाणाऱ्या मार्गावर झाडे कोसळल्याने बाज़ार पेठ आज दिवसभर बंद होती. वायरलेस यंत्रणेचा टॉवर कोसळल्याने पोलिसांची वायरलेस यंत्रनाही कोलमडली.कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरीही करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे।सुमारे ५०० घरांना धोका पोहोचला आहे. याचे सर्वेक्षण करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधि लागणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे. तालुक्यात सुमारे १५०० हुन अधिक झाडे कोसळली आहेत.

Tuesday, November 10, 2009

सांगून टाक तू...


सांगून टाक तू काय आपुले नाते
का उगा मनाचा तळ उसवत जाते...
घेवूनी समाधी जरी पहुडलो येथे
हि झुळूक तुझी पण प्राण फुंकुनी जाते...

मी विसरत जातो संदर्भ तुझे नि माझे
तर पुन्हा ठोकती आठवणी दरवाजे
प्रत्येक आठवण मनात अडकत रहाते
सांगून टाक तू काय आपुले नाते...

वेदनेस अचानक जीव होतसे परका
श्वासात गुदमरे तरीही निखारा जळका
पेटते न काही नुसते धुमसत जाते
सांगून टाक तू काय आपुले नाते....

- कैलास गांधी

Monday, November 9, 2009

श्रावणभूल


वाऱ्याची घुमते शिळ...
तसा घननीळ... वाजवी पावा
झरझर जातसे सर...
डोंगराआड कोणत्या गावा

बेभान होतसे वारा
घाली येरझारा...वेड्यावाणी
झाडास भरतसे चाळा
वाजवी टाळ्या... पानोपानी

पक्षांच्या चालल्या ओळी
खाली रांगोळी... सावल्यांची
ओढ्याची चालू खळखळ
कि बोलतो...बाळ पाळण्याशी

संन्यस्थ उभा तो वड
नदीकाठाड... वाकलेला
पारंबी खेळतो पक्षी
रंग गुलबक्षी... माखलेला

हलकेच येतसे उन
डोळे मिचकून... धुंद नाचे
नदीस लागले खूळ
शोधते मूळ... सागराचे

काळजात उतरली ओळ
जातसे तोल... सावरेना
धुक्यात हरवला गाव
शोधूनी ठाव... सावरेना


- कैलास गांधी

पाऊस पडतो




पाऊस पडतो थेंब थेंब पण
काळजास या दुखवित जातो
जखमांमध्ये खोल खोल अन
हिरवे काही रुजवीत जातो

-कैलास गांधी



Saturday, November 7, 2009

प्रेम म्हणजे


जाणीवेच्या पुस्तकातील हळव पान
....म्हणजे प्रेम
नेणीवेचा वणवा शिल्लक रान
....म्हणजे प्रेम
प्रेम म्हणजे....
.. डोंगर,..झाड,...पान,..पुस्तक,..शाई..
प्रेम म्हणजे गुंता नुसता
.....सुटतच नाही

- कैलास गांधी

Friday, November 6, 2009

आत्महत्या




आत उधाणलेला दर्या...
आणि पापण्यांची गलबतं
नांगर सोडण्याच्या तयारीत
हा आत्महत्येचा संकल्प म्हणावा
की हाराकिरी!

हे ठरवण्याआधी... मी चालू लागतो
.... समुद्राच्या दिशेने




तर किनाऱ्यावर...

नक्षीदार पायघड्या पसरलेल्या खेकड्यांनी

.................
ही माझ्या स्वागताची तयारी म्हणावी की,
मला वाचवण्याचा केलेला शेवटचा अट्टाहास


हे मला ठरवता येत नाही
मी थोपवू शकत नाही...


दूर सीमेपलीकडून येणाऱ्या हाका
हाकांमागून येणारी आमंत्रणे...
आणि घरातल्या मांजरीसारखी...

.. दररोज पायात लुडबुडणारी स्वप्ने
आणि तरीही मी अस्वस्थ होत नाही॥


ही माझ्या मेलेपणाची जाणीव म्हणावी की....


- कैलास गांधी

रात्र अनेस्थेसिया देईपर्यंत


दिवसाचे पोस्टमोर्टम केल्यावर
हालत राहतो मेंदू...
अन काळजाचा तुकडा...
संध्याकाळच्या फोर्मिलीनमध्ये
रात्र अनेस्थेसिया देईपर्यंत...


तसे आपण सर्वच जन चालत रहातो
अपघाताने...वाट अपघाताची
रुळावरती दरडी कोसळेपर्यंत
सर्वच कसे सुखरूप असते...
रेल्वेच्या प्रवासासारखे


नाही म्हणायला
तरीही प्रत्येकजण तपासात असतो
आतली धडधड
डॉक्टरच्या स्टेथोस्कोपसारखा
...सराइतपणे


सतत वाटत राहते
आपण जिवंत असल्याची भीती
आणि होत राहतात भास
...श्वास चालू असल्याचे
........................
........................
...रात्र अनेस्थेसिया देईपर्यंत


-कैलास गांधी

Monday, October 12, 2009

बारामतीचे हत्ती आणि सुळे


बारामतीतील हत्तींना म्हणे
घराणेशाही खपत नाही
खायचे दात लपवले तरी
बाहेरचे सुळे लपत नाहीत

-कैलास गांधी

ना-'राज' ठाकरे


साहेब म्हणाले,
हे खरे तर उद्धवाचे राज आहे
आधी मुलगा... मग पुतण्या...
...त्यानंतर समाज आहे
कोण म्हणते भगव्याला
विरक्तीचा शाप आहे
वारस कसा रक्ताचा हवा
केवढा मोठा 'व्याप' आहे

- कैलास गांधी

मी छंदी फंदी...


मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी

मी
लुच्चा, लफंगा, चोर, बदमाश
...बेवडा मी
तुझ्या वेणीत माळलेला घमघम
...केवडा
मी

मी सांज उषेच्या किरणांनी
विणतो शाल दिवसाची
मी रात्रीस बायको म्हणतो
संध्येस रखेल दिवसाची

मी
काळोखाच्या गर्भात
उजेडाच्या खडूने लिहीतो
मी सटवीच्या भाळावर
उद्याचे भविष्य
लिहितो

मी हात जोडतो सुर्यास
अन् म्हणतो जाळ मला
सागरास मारतो मिठी
अन् म्हणतो सांभाळ
मला

मी कोणत्या अनामिक आवेगाने
काळजात ठोकतो खिळा
ही भूक कोणती अशी
आतड्यास द्या म्हणे
पिळा

ह्या
कळा घेउन युगांच्या
मी काट्यांच्या चालतो वाटा
काट्यास शोधती पाय
की पायास शोधतो काटा


मी शिंपून धर्मबिंदू
शमवतो तहान रक्ताची
मी विठ्ठलास गडी म्हणतो
रुक्मिणीस दासी भक्ताची

मी छंदी फंदी...दु:खात आनंदी
...माणसांच्या रानात मला बंदी


-कैलास गांधी